Followers

मंगळवार, डिसेंबर २०, २०२२

माझं माहेर !

माझं  माहेर  हो गोड
गाऊ  किती गुणगान
माहेर शब्द उच्चारता
विसरते  मी  देहभान

माझं   माहेर  जणू 
मायेचं साजूक  तूप
आईबाबांचा प्रेमाचं
आहे अनमोल रुप !

माझ्या माहेराची गोडी
बहू  अविट अविट
माहेरचा    वाटेवर
सोन्या चांदीचे हो पाट 

माझ्या माहेरची गाणी
गातो  स्वर्गीचा गंधर्व
माहेराची  जन्मकथा
भाट  पोथीचा संदर्भ

माहेरची  सय  येता
मनी  भेटीची हूरहूर
आई बाबांना बघण्या 
जीव  होई  अनावर !

असं  माझं  माहेर
सुखाचं  हो आगर
आनंदाचा वाहे झरा
मायेचा  ते  सागर!

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

सोमवार, डिसेंबर १९, २०२२

तरुण पिढी -एक आव्हान

🌷🌷 जिवलग ग्रुप अंतर्गत आजचा विषय - तरुण पिढी एक आव्हान
🌷🌷विषय सुचक - प्रगती ताई भोसले 🌷🌷

   आजचा विषय...तरुण पिढी एक आव्हान!
  हा विषय वाचताच माझ्या डोळ्यासमोर आजची तरुण मुले,मुली उभी राहिली.मला वाटते,ही तरुण पिढी आज  समाजासाठी खरंच एक आव्हानच आहे .हे म्हणायचं धारिष्ट्य मी का करतेय ? त्यांचे कारण---
आजची तरुण पिढीत आदर उरलेला नाही.नैतिकता स्विकारण्याची जबाबदारी दिसून येत नाही.चाळीस वर्षांपूर्वी आपण तरुण असतांना " सातच्या आत घरात.उशिर केला तर उभा राहू नको दारात! " असा आपला शिरस्ता होता.बाहेर कोणाशी वाद घालणं,दंगा करणं,एखादा स्टंट करणं.स्टंट कोणता तर,झाडावर चढणं.हे करण्याआधी सतरांदा विचार करावा लागे.कारण आपली तक्रार जर कोणी घरी केली तर आई-बाबा, काकांच्या हातचा मार मिळेल.हा नैतिक धाक वाटे.
जी काही जबाबदारी आपल्यावर सोपविली असेल ती पार पाडणे हे नैतिक कर्तव्य समजले जाई.पैसा घाम गाळून मिळतो.तो मौजमस्ती,धांगडधिंगा करुन,वायफळ खर्च करायचा नसतो.खायचं तर फक्त घरचं...तेही आईच्या हाताने बनवलेलेच ! ही शिस्त घराघरातील तरुण पिढीला होती.
  आज आपण काय पाहतो.वरील  चित्र नेमके उलटं लटकलंय.खरंय ना!चार पाच किलोमीटर पायी ये जा करुन शाळा शिकणे,शेतीकामात,घरकामात शाळा सांभाळून आई बाबांना मदत करणे,ही कामे सांभाळली जात.आज हे या तरुण पिढीला जमतच नाही.शाळेत जायला बाईक,खिशात नाश्त्याला पन्नास शंभर रुपये हवे.मोबाईल हवा.वर्षाला किमान चार पाच ड्रेस हवे.हे सगळं आजच्या तरुण पिढीला हवंच! आणि नाही दिलं तर...वृत्तपत्रात , दूरदर्शनवर आपण बातम्या पाहतो,आई बाबांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलाची आत्महत्या! दूरदर्शन पाहू न देता अभ्यास कर म्हटलं तर मुलांची आत्महत्या! त्या शाळेत फी भरणं शक्य नाही,या शाळेत प्रवेश घे! म्हटलं म्हणून मुलाचे/ मुलीचे घरातून पलायन! अशा एक ना एक घटना आपण रोज वाचतो.हे किती भयानक !
 दुसरी गोष्ट आपल्या काळात आई बाबा परस्पर मुला/ मुलींची सोयरिक जुळवून मोकळे होत.तरी आपल्या काळात ब्र शब्द न काढता बोहल्यावर उभे राहावे लागे.आज ही गोष्ट दिसत नाही.आई बाबांच्या विचारांना,आवडीला छेद देऊन नकार देण्याची हिंमत तरुणाईत दिसते.अती विरोध झाला तर मग घरातून पलायन.किंवा आत्महत्या! ही गोष्ट सहज साध्य करणारी ही तरुण पिढी आव्हान ठरते आहे.
  आपल्या काळात शिक्षकांविषयी प्रचंड आदर होता.समाजातील वडिलधाऱ्या व्यक्तीविषयी आदर होता.हे आज दिसून येत नाही.शिक्षकांनी शिक्षा केली तर घरी एका शब्दानेही तक्रार न करणारी आपली पिढी.म्हणूनच तर आपणास पावकी,दिडकी,बे एकी बे,अकरा एकी अकरा हे पाढे तोंडपाठ असत.सुभाषिते ,रामरक्षा, तोंडपाठ असत.आणि आज नेमके उलटे चित्र ! शिक्षकांवर हात उगारणारी,प्रसंगी व्यसनाधीन होऊन आई बाबांवर ही हात उचलणारी मुले समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात.सगळेच मुले असे वागतात.हे म्हणणे चुकीचे ठरेल.पण,आजच्या तरुण पिढीत  वृद्ध आई बाबांना सांभाळण्याची इच्छा शक्ती दिसत नाही.ते म्हणतात, " आई बाबा नव्वद वर्ष जगतील तर आम्ही काय त्यांचाच सांभाळ करावा काय? आम्हालाही काही मौजमजा आहे की नाही.मग ठेवलंय मी त्यांना वृद्धाश्रमात! " असे म्हणणारेही समाजात कमी नाहीत.ज्या आईनं नवमास पोटात वाढविले,दिड दोन वर्ष स्तन्य पाजले ,ज्या बापाने घोडा होऊन घरभर पाठीवर मिरविले.त्यांचे हाल करणारी अशी तरुण मुले पाहिली,ऐकली की आजचे जगण्याचे प्रचंड आव्हान समोर उभे राहते.आणि वाटतं खरंच तरुण पिढी एक आव्हान आहे.
     लिहिण्यासारखे भरपूर आहे.पण,लेखणी इथेच थांबविते!


🌷🌷 जिवलग सारखा ग्रृप असावा 🌷🌷
🌷🌷 प्रेम जिव्हाळा मनी वसावा 🌷🌷


©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

सोमवार, नोव्हेंबर १४, २०२२

माझं गोड बालपण (अष्टाक्षरी)

आठवलं आज मला
माझं गोड  बालपण
प्रेम   भाव  निरागस
जणू   केळं शिकरण।।१।।

स्वप्न    दुनियेत    रमे
जणू  छान  परीराणी
खेळतांना गाऊ आम्ही 
गोड   सुमधूर  गाणी।।२।।

बसायला   होती  एक
शुभ्र पंखांची हो गाडी
ओढायला होती छान
दोन  हरणांची   जोडी।।३।।

मन   उद्यानी   बागडे
छान   ग्   फुलपाखरू 
सप्तरंगी       दुनियेत
उडायचे     भिरभिरू।।४।।

साय    दुधावरची  हो 
आजी आजोबांची माया  
प्रेम, माया   सावलीत 
खुलायची माझी काया।।५।।

खेळताना    होत  असे
आम्हा  मैत्रिणींची गट्टी
धावताना      पडताना
क्षणोक्षणी  कट्टी   बट्टी।।६।।

सरसर     येता    सरी
झेलायचो      हातावर
पावसांत    भिजतांना
हर्ष   होई      अनावर।।७।।

करायचो    आळवणी
आम्ही  भोलानाथाला
तळे  साचू  दे  शाळेत
सुटी मिळू दे आम्हाला।।८।। 

*आज येता  बालदिन*
आठवलं      बालपण
नेहरुंना    करीते    मी 
विनम्रसे   अभिवादन !।९।।।

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

मंगळवार, ऑक्टोबर २५, २०२२

दिपोत्सव (अष्टाक्षरी)

दिपोत्सव  आनंदाचा
तेजोमय   प्रकाशाचा
करु  साजरा   आनंदे
सण  महा मांगल्याचा

दिपोत्सव  आनंदाचा
करु दिव्यांची आरास
लावू  आकाशकंदील 
शोभा आणुया  घरास

आला  प्रथम  दिवस
संगे   हो   वसूबारस 
गोवत्साला   भरवूया
गवार  भाकरी  घास

येता      धनत्रयोदशी 
पुजा   धन   धन्वंतरी
आयुर्रोग्य लाभे सर्वा
तेज    पसरे    अंतरी

येता    नर्क   चतुर्दशी 
प्रातः हो अभ्यंगस्नान 
सडा  टाकता अंगणी
शोभे रांगोळीही छान 

करीता    लक्ष्मीपूजन
वाढे   गृहलक्ष्मी  मान
धूपदिप        नैवेद्याने
करु  वही  पूजा  छान

प्रिय  दिवाळी  पाडवा 
गृह  स्वामीचे  औक्षण
मिळे प्रेम स्नेह सौख्य
लाभे सौभाग्याचा दिन

भाऊबीज   आनंदाची
बंध   रेशमाचे    अतुट 
ओवाळीता   बंधुराजा
जुळे नाते   हो  अवीट

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

मंगळवार, ऑक्टोबर ११, २०२२

आई, घे ना गं उसंत !

आई तू  घे ना उसंत थोडी
आता नको ना करु ग् कष्ट !
आता तरी जग स्वतःसाठी  
आरोग्याला आहे वेळ इष्ट

भल्या पहाटे उठून सारे
काम हातावेगळे करते
कधीतरी निवांत बसून
घे मज्जा बघ कसे वाटते

जीवाला जीव लावणारी ग् 
आई माणसं तू  जमवली
राग लोभ मनी न ठेवता
ऋणानुबंधात ती बांधली

सगळ्यांचं सगळं केलं तू
दुःख संकटे सारे झेलले
आई तरी तुझ्या मुखातून
अमृताचे   झरे   पाझरले

आई  अनंत माया ममता 
सदैव   करते   पिल्लांवर
एकदा   तरी  करुन  बघ 
प्रेम तुझे  तू  ग  स्वतःवर

©® सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

रविवार, ऑक्टोबर ०९, २०२२

कोजागिरी पौर्णिमा

शरद्पौर्णिमेच्या चांदण्यात 
मी घेतली लेखणी हाती
आनंद वाटे मजला आज 
सारं  विश्व  आज सोबती 

ता-यांचा झुल्यावर आज
चांदोबा   बघा   विराजले
क्षिरपात्र  भासे मज जणू
अमृत  घट  घेऊन  आले
  
निळ्या नभीचे चंद्र किरण
केशरयुक्त  दुधात  न्हाती
वाटे  चांदण्यांचा संगतीने
कृष्ण राधा रास खेळती !

समृध्दीचा आशिष देऊन
निघाली कोजागिरी निशा
सुख समृद्धी वस्र लेऊन
पहा उजाडल्या दशदिशा !

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

बुधवार, सप्टेंबर २८, २०२२

वाफाळलेला चहा

अहो...एक कप चहा
वाफाळलेला...
घोटभर का असेना 
पिऊन तर पहा !

अंगाची हुडहुडी
करण्यासाठी दूर 
फुर्रऽऽकन प्या...
उबदारपणासाठी चहा !

स्फूर्ती येईल प्यायल्याने 
दिवसाची गोड सुरुवात
 चहाने हो होईल
तन-मन आनंददायी पहा...!

डोकेदुखी असो की चक्कर 
चहा घेता होई छुऽमंतर 
अशी जादू न्यारी
दाखवी एक कप चहा !

आपुलकी वाढवितो
माणसा माणसात 
गोडी वाढवतो जनमानसात
 त्यास मोठ्ठा मान अऽहा!

वाटू लागता कंटाळवाणे
चहा प्यावासा वाटे
गप्पांच्या मैफलीत 
वासाने स्फूर्ती देतो चहा
 
प्रीतिची हाक ऐकता
मन जेव्हा सैरभैर होते
मिलनाची तृष्णा शांतवी
हॉटेलच्या टेबलावर चहा!
 
पै-पाहुणे येता घरा
स्वागता चहापान
प्रेमाने गातो आबालवृद्ध 
चहाचे गुणगान 

प्रेमाचं प्रतीक आहे 
फक्त एक कप चहा
पिऊन झाल्यावर मिळवतो
 प्रियकराची वाहऽऽवाऽ !

चहाच्या वाफेसारखे 
सुख दुःख उडवून द्यावे
गोडवा ठेवून आपल्या मनात
जीवनगाणे आनंदाने गावे !

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

शुक्रवार, ऑगस्ट २६, २०२२

बैल पोळा

सर्जा राजाची जोडी
बघा सजली अंगणी
श्रावणात सण आला
बैल पोळा म्हणूनी

वर्षातुन एक दिवस
बैलांचा ह्या सणाला
बळीराजा करी कृतज्ञता
श्रावण अमावास्येला

झुल घालून अंगावर
बैलांना सुंदर सजवतो
रंगवून दोन्ही शिंगांना 
फुगे गोंडे त्यांना बांधतो

नैवेद्य करतो आज खास
खीर अन् पुरणपोळीचा
घास अमृताचा भरवतो तेव्हा
आनंद बघावा बळीराजाचा

असा हा मित्र शेतकऱ्यांचा
राबतो वर्षभर निष्ठेने
उभ्या जगाचा पोशिंदा
जीवन जगतो कष्टाने

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्" 
   म्हसावद जि नंदुरबार

शुक्रवार, ऑगस्ट १९, २०२२

बासरी मनमोहनाची

🌷🌷🌷जीवलग गृप अंतर्गत आजचा विषय-बासुरी मनमोहनाची...!
विषय सुचक-सौ पुष्पा पटेल "पुष्पम्" अर्थात मीच स्वतः🌷🌷🌷

    बासरी...पावा ! हे भगवान् श्रीकृष्णाच्या हातात शोभणारे एक लोभस वाद्य. भल्या भल्यांना वेड लावणारे...! कन्हैयाच्या बासरीचे सूर उमटावेत आणि गोपिकांनीच काय गाई-वासरांनीही देहभान विसरून जावं इतकी ह्या बासरीची किमया अगाध...!
श्रीकृष्णाच्या मनमोहक बासरीला जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला ती बासरी श्रीकृष्णाच्या हातात कशी आली ते पाहणे अधिक रंजक ठरेल.         
    द्वापारयुगाच्या काळात भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवर अवतार घेतला असता त्यांना भेटायला देवी देवता वेळोवेळी पृथ्वीवर येत असत.भगवान श्रीशंकरजींनी पाहिले की आपणही श्रीकृष्णांना भेटायला जावे. पण,भेटायला जातांना रिकाम्या हातांनी जाणे योग्य ठरणार नाही .हा मनात विचार येताच श्रीशंकर थांबले. काय बरे घेऊन जावे श्रीकृष्णांना भेट देण्यासाठी आपण ? अशी एखादी वस्तू न्यावी की जी भगवंतांना अतिशय प्रिय वाटेल, आणि ती कधीही सोडायच्या मोह त्यांना होणार नाही .श्री शंकरजींनी खूप विचार केला. हाऽऽ आठवले तर ! त्यांच्याजवळ दधिची ऋषीचे एक हाड पडून होते. दधिची ऋषी हे महान ऋषी होत. त्यांनी देव दानवांच्या युद्धात दानवांवर देवांना विजय प्राप्त करता यावा यासाठी आपले संपूर्ण शरीर इंद्राला दान दिलेले होते. त्याच दधिचीच्या हाडाने वज्रनामक आयुध बनविण्यात आले होते. नंतर उरलेली जी काही हाडं होती ,त्यातून विश्वकर्माने तीन प्रकारचे धनुष्य बनवले एक पिनाक धनुष्य, दुसरं गांडीव धनुष्य, आणि तिसरे शारंग धनुष्य. शंकरजींनी ते उरलेले एक हाड हाती घेतले. त्याला घासून योग्य असा आकार दिला , आणि अत्यंत सुंदर मनमोहक अशी एक बासुरी तयार झाली.श्री शंकरजी ती सुंदर बासुरी घेऊन श्रीकृष्णांच्या भेटीला निघाले. भगवंत तेव्हा गोकुळात होते.गोकुळात जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना स्वहस्ते तयार केलेली ती बासुरी प्रेमभराने सुपूर्द केली . भगवान श्रीकृष्ण अत्यंत आनंदित झाले आणि श्रीशंकरजींनी आपल्यासाठी आणलेली ही खूप अनमोल भेट आहे असे आनंद्गोगार काढले.
म्हणाले, महादेव...आपण आणलेली ही भेट अद्भूत अशी आहे. आपण दिलेली ही अनमोल भेट मी या अवतारात तरी विसरणार नाही.ही बासुरी एक क्षणभरही मी कधीही माझ्यापासून दूर करणार नाही. असे आश्वासन दिले.
कन्हैयाने आपल्या पूर्ण अवतार कार्यात ती बासरी अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या हाती ठेवली.
अशी ही बासरी श्रीकृष्णाची मोहक बासरी झाली. बासरी आणि श्रीकृष्ण हे नातं अतूट झाले.
    श्रीकृष्ण ती बासरी ओठांना लावून जेव्हा वाजवत असत तेव्हा त्या बासरीचे सूर चराचरातील यच्चयावत घटकांना मोहित करीत असत.असे म्हटले जाते की, श्रीकृष्ण यमुनेच्या काठी गाई घेऊन जात.सोबत गोपाळ असत. जेव्हा ते बासरी वाजवत तेव्हा खळाळणारे यमुनेचे पाणी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन वाहणे थांबत असे. गाई गुरे वासरे सर्व बासरीचे सूर ऐकताच कदंबाच्या झाडाखाली बेभान होऊन गोळा होऊ लागत.कदंबवनातील पशू,पक्षी, श्रीकृष्णाच्या आजूबाजूला येऊन बसत असत. कदंब वनातील मोर बासरीच्या सुरांनी मुग्ध होऊन आपला पिसारा फुलवून थुईथुई मनमोहक नृत्य करू लागत. वृक्ष वेलीचे थरथरणे सुरांनी मोहित होऊन बंद होई. ज्या ज्या नरनारींच्या कानी बासरीचे सूर पडत त्यांची तहानभूक विसरली जात असे.गोकुळातील गवळणी हातातील काम धंदा सोडून,खाणे-पिणे सोडून भान हरपून कृष्ण भेटीला निघत.पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या काठी बासुरीच्या सुरांनी मोहित होऊन चंद्र,तारे उंच आभाळी जागच्या जागी स्तब्ध होत असे.राधिकेला भेटीची हुरहूर दाटून लागले.तीला कृष्ण भेटीची उत्कंठा दाटून ती बावरी होई. आकाशातून वर्षाव करणाऱ्या मेघांच्या धारांचे कोसळणे बंद होई. 
अशी अगाध मोहिनी श्रीकृष्णाच्या बासरीची होती. गोपिकांना तर या बासरीने अक्षरशः वेड लावले होते. कृष्णाची बासरी वाजावी व कृष्णाच्या बासरीतून सूर निघावे, आणि गोपिकांनी त्या सुरांनी मोहित होऊन श्रीकृष्णाच्या भेटीला धावत येऊ नये असे कधी झालेच नाही, आणि ज्या दिवशी श्रीकृष्णाची बासरी वाजली नाही तिचे सूर कानी आले नाही त्या विरहाने सुद्धा गोकुळातील गोपिका वेड्या होत.अशा या बासरीचे अमोघ वर्णन करता येईल.या बासरीच्या सुरांनीच राधा श्रीकृष्ण यांच्यात प्रेमबंध जुळला होता. गोपिकांना वाटे की श्रीकृष्णाने आपल्याजवळ जास्त वेळ खेळावे, आपल्याजवळ जास्त थांबावे ...पण तो बासरीशी जितका खेळतो तेवढा आपल्याशी का खेळत नाही?अर्थात् ती बासरीची किमया की कन्हैयाची हे सांगणं अवघडच...! याविषयी एक कथा सांगितली जाते... 
 कृष्णाचं आपल्यावर नव्हे तर बासरीवर सर्वात अधिक प्रेम आहे हे जाणून गोपिका बासरीवर चिडून असायच्या. एकदा त्यांनी बासरीलाच विचारलंच की,अग बासुरी... आम्ही असताना कन्हैयाचं तुझ्यावर इतकं प्रेम कसं? तर बासुरीने सुंदर उत्तर दिलं की, मला एकूण सात छिद्रं आहेत. त्यातल्या ६ छिद्रांतून षड्रिपू ( काम, क्रोध,मद,
मोह,लोभ, मत्सर,)केव्हाच 
बाहेर गेलेले आहेत. सातवे छिद्र म्हणजेच माझे (बासुरीचे) मुखरंध्र, तिथून केवळ कन्हैयाने फुंकर मारली तरच सूर निघतो.(आवाज येतो) म्हणजे मला स्वतःचा आवाज नाही. म्हणूनच मला अहंकारही नाहीच. म्हणूनच कन्हैयाला मी जास्त जवळची आहे. हे ऐकून गोपींचा अजूनच जळफळाट झाला.आणि त्या स्वतःला बासुरी बनून घेण्याचा प्रयत्न करु लागल्या.अशी ही बासुरी मनमोहक मनमोहनाची!
🙏🌹 जय राधे कृष्ण !🌹🙏

🌷🌷जीवलग सारखा गृप असावा🌷🌷
🌷🌷प्रेम जिव्हाळा मनी वसावा🌷🌷

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

लेखकाचं जीवन

लेखकाचं जीवन म्हणजे...
वसंतात बहरलेला पुष्पपिसारा
नव्या पालवीचा प्रसन्न नजारा
निराश मनाला प्रेरक इशारा
कोरड्या मृदेला धुंदगंध देणारी 
पहिल्या पावसाची धारा ! 
मरगळलेल्या विचारांना
उभारी देणारा वारा
आयुष्य सुंदर आहे ते आनंदाने जगावे!
हे सांगणारा महान नारा
नर अच्छा कर्म करे सो...
नारायण हो जाय!हा मंत्र घोष प्यारा 
कधी शब्दांची करुनी फुले
सुगंधित करतो दुनिया
कधी शब्दांची करुनी शस्त्रे
दाखवी दुनिया बदलण्याची किमया!
कल्पनेचे लावून पंख
पाहतो दशदिशांची सृष्टी
जे न देखे रवि ते देखे लेखक कवी
लेखणीतून करतो शब्दमोत्यांची वृष्टी
साहित्याचा पदपथावर...चालतो 
साहित्य शारदेचा होऊन पथिक
रामायण महाभारत गीता ग्रंथ... 
कथा कविता कादंबरी लेखनातून पेरतो विचार नैतिक
बालगीतातून बागडतो...
आनंदाचा नंदनवणी
लेखकच जगतो होऊन 
साहित्य सरितेचा धनी !


©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"


गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२

रक्षाबंधन



भाऊ माझा सदा पाठीराखा
सुखदुःखात होतो वाटेकरी
सावली सारखी सोबत त्याची
राखी,भाऊबीजेचा तो मानकरी 

देवा प्रार्थना करीते मी तुजला
दे आयुरारोग्य माझा भावाला
द्यावा तू प्रेमभावे आशीर्वाद
त्याचा कष्ट आणि कर्तृत्वाला !

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

रविवार, ऑगस्ट ०७, २०२२

बालपणीची मैत्रीण

आयुष्याचा प्रत्येक टप्प्यात
नविन मैत्रीणींची साथ आगळी
पण् बालपणीचा मैत्रीणींची
गंमत असते बरं जगावेगळी

मैत्रीचा सुगंध दरवळे
आसमंती चोहीकडे
भातुकलीचा खेळ अन्
लुटूपुटूची भांडणे गं गडे

क्षणात रुसवे क्षणात दोस्ती
एकाच चाॅकलेटचे करी दोन तुकडे
जीवाला असते जीव देणारी
आनंदी आनंद जिकडे तिकडे

आठवण येता बालपणीची
जाई मन माझे हो माहेरा
अक्षय तृतीयेचा झोपाळ्यावर
झोका घेऊन परत येई त्वरा !

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"


गुरुवार, ऑगस्ट ०४, २०२२

नानीची गाणी

आज दिला लिपीने विषय मस्त
आठवण झाली नानीचा गोड गाणीची
गाणी आहे आजही स्मरणात माझ्या
गाते मी अजूनही स्मरूण गाणी नानीची

गोड गळा होता माझ्या नानीचा
सुर ताल लयीत गाई मधुर गाणी
ऐकणारे सारेच होती मंत्रमुग्ध
वाटे मला जणू ती अमृतवाणी  !

नात तू माझी दुधावरची साय
कुणाशीही बोलतांना म्हणायची नाणी
म्हणे मला , जतन कर तू हे धन !
पिढीजात आलेली मौखिक लग्नगाणी

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"
म्हसावद जि नंदुरबार


मंगळवार, जुलै १९, २०२२

प्रेमाची वाट

सख्या... प्रेमाच्या वाटेवर
आपली जन्मोजन्मीची साथ
आले कितीही संकटे तरी
नेटाने करु रे त्यावर मात !

सख्या... प्रेमाच्या  वाटेवर
प्राजक्ताचा सडा दरवळला
विश्वासाचा नाजुक धाग्यात
मी माया ममतेचा मोती गुंफला 

सख्या... प्रेमाच्या  वाटेवर
सप्तप्रीतिचे इद्रधनु साकारले
जिव्हाळ्याचा वर्षावाचे तेज
मी हृदयाचा कोंदणी बसविले

सख्या...प्रेमाच्या वाटेवरची
तुझ्या माझ्या प्रेमाची रीत न्यारी
गोष्ट आहे एक नाविन्यतेची
युगानुयुगे वाटेल दुनियेला भारी !
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

शनिवार, जुलै ०२, २०२२

साखर पेरा...!

हसत खेळत रमत गमत
जगून घ्यावा प्रत्येक क्षण
क्षणभराचा सुखासाठी
दुखवू नका कुणाचं मन !

काही काळासाठी आहोत 
आपण पाहुणे भूतलावरी
लक्षात असू द्या ही समज
गोड रहा सर्वांशी साखरेपरी

गमतीनेही चोळू नका हो!
कुणाच्या दुखण्यावर मिठ 
मरणातही जगाने गावे
आपले प्रीतगोडवे अविट

©®सौ.पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, जून २५, २०२२

घे भरारी

बाळा,
तुझे जीवन सुगंधी गुलाबासारखे फुलावे
काट्यांशी सावध राहून त्यास तू खुडावे

तुझे तन मन तिन्ही सांज उमलावे
अत्यानंदाचा डोहात तू आकंठ डुंबावे

तुझ्या भरारीपुढती गगनही ठेंगणे व्हावे
पण् धरणीशी नाते तुझे घट्ट जुळावे

विहरतांना दशदिशी तुझ्या किर्तीला पंख फुटावे
माणूसकीचा उर्ध्व दिशेने तू उंच उंच उडावे

©®सौ. पुष्पा पटेल "पुष्पम् "

शुक्रवार, जून १७, २०२२

संजीवक अमृत चहा !

चहा म्हणजे सकाळचं अमृत असतो
चहा म्हणजे जगण्याची उर्मी
अन् हाॅस्पीटल मधल्या रुग्णांची स्फूर्ती
कार्य करण्याची देतो शक्ती
टेंशन आलं की सुचवितो नामी युक्ती
पाहुणचाराला तो प्रथम हवा
पार्टीला त्याचा पहिला मान
मुलाखतीला असतो टेबलवरची शान
कुणी काहीही म्हणा पण चहा हवाचं
पावसाळ्यात रिमझिम पावसात लागते भूक
तेव्हा गरम गरम भजी बरोबर वाफाळणारा चहा म्हणजे...
जणू स्वर्गसुख
असा गोड गोड अमृतमय चहा प्यायची मज्जा भारी
लहान मुलं खातात त्यांच्यासोबत बिस्कीट-खारी
अशा गोड दिव्य चहाची गोष्ट खूप खूप भारी !

समस्त चहा शौकीनांना आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
☕🫖☕🌹🌹☕🫖☕

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
      म्हसावद

शनिवार, मे २८, २०२२

माझे बालपण!

म्हणतात ना "बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा!"अगदी तसंच माझं बालपण साखरेचा रव्यासारखं खूप खूप गोड होते!
कधीही मला आता कंटाळा आला की तेव्हा आठवते मी माझे गोड, खट्याळ बालपण आणि बालपणीच्या आठवणी! कित्ती मज्जा होती त्यावेळी...ना कसलं काम ना कसली जबाबदारी होती फक्त मी आनंदलहरी!बाबांची होती लाडकी आईची सोनुली तर आज्जी आजोबांची होते मी तान्हुली !काय सांगू तुम्हाला माझी बालपणीची गम्मत सगळ्यांची मी होते लाडकी
मैत्रीणींसोबत खेळ खेळत अल्लडपणे खिदळणे, भातुकलीच्या खेळ नी त्यातले रुसवे फुगवे,अक्षय तृतीया आली की झोपाळा त्यानंतर गौराईचा गोतावळा, कोजागरी पौर्णिमा आली भुलाबाईची गाणी, झिम्मा फुगडी रास,गरबा एकमेकांचा खाऊ ओळखण्याची चढाओढ तसेच रंगपंचमीच्या सप्तरंगात न्हाणे! सगळं कसं अगदी स्वर्ग सुख होतं. अगदी सुख असो की दुःख कधीच मागे नाही राहिलो.सगळ्या मैत्रीणी अगदी जीवाला जीव देणा-या होतो आणि आजही आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटतो,मोबाईलवर बोलतो तासनतास!
  तसेच आमच्या घरीही आम्ही तिन भावंड मी मोठी त्यानंतर एक बहिण आणि मग लहान भाऊ.
मी मोठी असल्याने मला नेहमीच समजूतदारपणा दाखवावा लागे आणि ती दोघं नेहमी भांडायची पण मला मात्र आज्जी म्हणायची बेटा तू मोठी बहीण आहे त्या दोघांची मग तू घे ना समजून! मला मात्र तेव्हा खूप राग यायचा माझ्या मोठेपणावर.वाटायच़ं,"बाप्पाने मलाच का मोठी बहीण केलं मी सगळ्यात छोटी असते तर कित्ती मज्जा आली असती?"
  तसेच मामाच्या गावाला सुट्टीत ही खूप खूप मजा केली आम्ही.मामेभाऊ, मामेबहीण सगळे भर दुपारी नाना नानी झोपले की गुपचूप  उन्हात पानपिपळी,डबल इस्टोल असे खेळ खेळायला पळायचो.आणि मग नानांना जाग आली की एकमेकांवर यानेच मला खेळायला नेले असं खोटे आरोप करुन वेळ निभावून न्यायचो.कितीही भांडण झाले तरीही रात्री एकाच ताटात आनंदाने जेवायचो.कित्ती निर्मळ होते तेव्हा मन!
बालपण म्हणजे देवाने दिलेली अनमोल भेट असं मला वाटतं.म्हणून मी ते माझ्या हृदयाच्या कोंदणात अगदी अलगदपणे जपून ठेवलं आहे.
 आज एवढंच बस्स🙏

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
          ‌म्हसावद

मंगळवार, मे २४, २०२२

चाहूल पावसाची

पावसाची चाहूल लागता
बळीराजा शेतशिवारी रमतो
तरु,वेली,अन् पर्णापर्णावर
पाऊस सरींचा सडा जमतो

पावसाची चाहूल लागता
कवी मनाला येतो हुरुप
अक्षरांना जणू फुटतो कोंब
हिरवांकूंरा लाभे काव्य रुप

पावसाची चाहूल लागता
चातक गातो तरुतळी
पर्जन्यधारेला आलिंगन द्याया
नजर देई तो दिगंतराळी

पावसाची चाहूल लागता
वेडापिसा होतो वारा
सोबत घेऊन येई काळे ढग
अन् श्वेत मोत्यांचा धारा

पावसाची चाहूल लागता
बक तनुवरी केशरी रंग
मयुर फुलवी सुंदर पिसारा
मयुरी संगे होऊन दंग 

पावसाची चाहूल लागता
सागराला जला येई उधाण
किना-याला भेट द्याया
उंच लाटांनी होई बेभान

पावसाची चाहूल लागता
मन माझे घाले रूंजी
सख्यांभोवती पिंगा घाली
झुले आठवणींची पुंजी

पावसाची चाहूल लागता
आठवण येई बालपणीची
कागदी होड्या बनवून सोडी
मज्जा ती अनोखी बालमनाची

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
     म्हसावद

मंगळवार, मे ०३, २०२२

जीवन एक काव्यग्रंथ!

जीवनाच्या कवितांनी भरली
माझ्या   काव्यग्रंथाची  पाने
सुख  अश्वावर  होऊन स्वार
मी गाते  सुमधूर जीवनगाणे

जीवनाच्या  कवितेत माझ्या
आहे  बरं आनंदाची  हो पानं
त्या  पानांना  जपते  हळूवार
वाटते  मी  सुखाचे  हो  दान

जीवनाच्या  कवितेत  माझ्या
निरागस   बालपणाचं   पान
मौज - मज्जा   आणि  खेळ
आहेत  जणू आनंदाची खाण

जीवनाच्या  कवितेत  माझ्या
सप्तरंगी  जबाबदारीचे  पान
आपुलकीच्या   दृष्टीने  बांधून
वाटते   स्नेह   सौख्याचे वान

जीवनाच्या   कवितेत  माझ्या
सहजीवनाचं    अनोखं   पान
विश्वास    समर्पण   हृद्यप्रेमाने
अहोंचा हृदयी मिळविले स्थान!

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, एप्रिल २८, २०२२

मन!

लेखन प्रकार-स्फुट लेखन 

विषय-मन

आपण जीवन जगत असतांना 
आपल्या आजूबाजूला सतत बरं-वाईट ,सुख-दु:ख,आनंद-क्लेश देणारं असं काहीतरी घडत असतं.त्यापैकी काही चांगल्या,काही वाईट घटना आपल्या मनावर नकळत कोरल्या जातात.त्यातून मनावरही बरे-वाईट घटनांचे जाळे तयार होऊन मन अस्थिर होते आणि मनात संघर्ष सुरू होतो.त्यावेळी हे ' मन ' नावाचं डोळ्यांना न दिसणारं इंद्रिय हाती धरुन ठेवावं तर तेही करता येत नाही.जलाशयात उठणा-या तरंगासारख,पा-यासारखं नाजूक-हाती न येणारं असं हे मन जीवाला स्वस्थता लाभू देत नाही.खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांनाही प्रश्न पडला होताच की ! म्हणून तर त्या मनावर चिंतनशील काव्य लिहून गेल्या.
' मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।। ' 
मनाच्या अशा गमजा विचारात घेऊन निराश होऊन शांत बसून नाही चालणार !
मग आपण काय करावे? तर...
सकारात्मक विचार करून जर आपण जीवनाची वाटचाल सुरू ठेवली तर आपल्या वाटेवर खूप आनंदाचे क्षण, समाधानाचा फुलांची पखरण आपल्याला अनुभवाला येते. " भरून पावलो देवा !" असे आनंदानुभूती देणारे उद्गार आपसूकच ओठांवर तरळू लागतात. 
    पण नकारात्मक विचारांचा बेडूक पाहत बसलो तर तो हळूहळू फुगत जातो.हे लक्षात घ्यावे. मनाला सदैव ताब्यात ठेवता आले पाहिजे.असे जर केले नाही तर...मनाच्या घोड्यावर राग नावाचा रिपू स्वार होतो आणि तो मोठ्या कष्टाने,प्रेमाने, जिव्हाळ्याने जीवनात जे जे काही चांगलं पेरुन ठेवलेलं असतं,त्या शेतीची नासधूस करीत सुटतो.म्हणूनच ' राग ' या स्वाराला मनाच्या अश्वाजवळ येऊच देऊ नये.त्यासाठी ' संयम ' नावाचा द्वारपाल जवळ बाळगावा.
थोडक्यात काय तर ... आपल्या ' मन ' रुपी अश्वावर आपलं पुर्णतः नियंत्रण असले पाहिजे.त्याला चौखूर उधळू न देता तोंडांत काटेरी लगाम लावता आली पाहिजे.निश्चयाच्या रिकिबीत पाय घट्ट रोवता आले पाहिजे. म्हणजे खाली पडण्याचा धोका ( अपमानित होण्याचा) निर्माण होणार नाही.
    सोप्या शब्दात सांगायचे तर - प्रियजनहो,रागाच्या भरात,संयम विसरुन कोणताही लहान असो वा मोठा निर्णय घेऊ नका. राग आल्यावर चिडू नका ,तर काही वेळ डोळे घट्ट मिटून शांत बसून रहा.एक ते शंभर अंक बोलत रहा. आपल्या आवडत्या व्यक्तीशी संवाद साधा.आवडत्या फुलांचा सुगंध अनुभवा, परंतु अशा प्रसंगी मूग गिळून एकांतात गप्प बसणे ही कृती " हलाहल विष ' समान ठरु शकते.शेवट काय? तर स्वविनाश हा अटळच!
  लक्षात ठेवा,तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य फक्त तुमच्या मनात स्फुरणा-या सकारात्मक विचारात आहे.म्हणून काम,क्रोध, मद,मोह,मत्सर आणि मोह या षढ्रिपूंवर विजय मिळवायला शिका.
शांत,संयमी राहाल तर हमखास सुखसमृद्धी मिळवाल.
     संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की, मनासारखं  दुसरं दैवत आपल्याला शोधून ही सापडणार नाही म्हणून ते म्हणतात-
मोकळे मन रसाळ वाणी | याची गुणीसंपन्न ||१||
लक्ष्मी ते ऐशा नावे | भाग्य ज्यावे नरी त्यांनी ||२||
नमन ते नम्रता अंगी | नेघे रंगी पालट ||३||
तुका म्हणे त्यांची नावे | घेता व्हावे संतोषी ||४||
इतुके सांगुन संत शिरोमणी तुकाराम महाराज थांबत नाही तर ते म्हणतात-
" मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण !
मोक्ष अथवा बंधन  सुख समाधान इच्छा ते!"
म्हणून आपण आपले मन सदैव निर्मळ,निरोगी,निडर,निकोप ठेवू या ! सदैव प्रसन्नचित्त,आनंदी,राहू या !
माझ्या मनातही आता एक फुलपाखरू उडतयं ते असं...
    मन फुलपाखरू

आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन माझे वेडे झुलते रे !
क्षणात येते क्षणात जाते
फुलपाखरू होऊन भिरभिरते रे !
बालपणीच्या अल्लड वाटा
उनाड होऊन चालते रे !
बालपणीच्या तो काळ सुखाचा
कानी हळूच गुणगुणते रे !
निमिषार्धात घेऊन गिरकी
सप्तरंग जीवनाचे दाखवी रे!
सुख हर्षाच्या गंधकोषी
सख्यासवे गूज करते रे !
नाजूक लता ही संसाराची
हळवे होऊन जपते रे !
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन माझे वेडे झुलते रे !

🌹 शुभं भवतू 🌹 
🙏 🌹जय जय पांडुरंग हरी 🌹🙏


©®सौ. पुष्पा पटेल "पुष्पम्".
    मु.पो.म्हसावद.

सोमवार, एप्रिल २५, २०२२

सुखी संसार!

सख्या,संसाराचा मांडलाय ना डाव
मग खेळू आपण तो आनंदें

तू जिंकलास तरी डाव आपलाच!
मी जिंकले तरी डाव आपलाच!

पण...त्यात रड मात्र नसावी
अखंड सोबत मला तुझी असावी

सुखदुःखाचा लाटेतही करु
जीवननौका ही आपुली पार 

माहिती रे!सारे हे डाव घडीचे 
पर्वा कुणाची का करावी ?

आपणच एकमेकांना जवळचे!
हाती हात  घेऊन  चालायचे...!

©®सौ. पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, एप्रिल २३, २०२२

योद्धा!

वाटतं तितकं सोपं नाही
योद्धा बनून जगणं...
सा-या स्वप्नांना बाजूला सारून
एकनिष्ठ होऊन देशासाठी लढणं...

आई,बाबा,पत्नी, मुलं
सुखदुःखात सारेच बघतात वाट
कुणाच्या होतील अपेक्षा पूर्ण
लढता लढता संपतो जीवनघाट

व्हावे सैनिकासारखा योद्धा
त्याग असे त्याचा महान
मायभूच्या रक्षणासाठी
करितो प्राणाचे बलिदान

वंदन करिते मी ...
योद्ध्यासी  कृतज्ञ होऊन
दोन्ही सुपूत्र भारतभूचे
जय जवान जय किसान!🙏

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, एप्रिल २०, २०२२

सिक्रेट मिशन !

सिक्रेट मिशन आहे हो...
माझं अन् कुलदेवतेचं खास
माझ्या कुटुंबासाठी राहते ती दक्ष
वर्षाव करते आनंद मोतींची रास !

जेथे जाते मी तेथे असते 
कुलदेवता माझ्या सांगाती
करिते मी सेवा सदैव भक्तीभावे 
लेक मी अन् ती आई सुंदर नाती !

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

सोमवार, एप्रिल १८, २०२२

निसर्ग गुरू

निसर्गाचा सहवासात 
रमते मी हो फार
आनंद मिळे मज
मन होई गारेगार

निसर्ग गुरूचा शाळेत
नोंदवू या आपले नाव
तिथे मिळालेल्या ज्ञानाने
आयुष्याचा वाढेल भाव

निसर्ग गुरू शिकवी
त्याग आणि समर्पण
सत्य शाश्वत घेऊनी हाती
विश्वची करू आनंदवन!

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...