[ सद्य परिस्थिती पाहता महाराष्ट्रात व देशात सर्वच राज्यांमध्ये लेकी-बाळींवर अत्याचाराच्या घटना अनुभवास येत आहे.हे हृदय पिळवटून निघते.त्या अनुषंगाने स्फूरलेली हे काव्य!]
फुलण्याआधी कोमेजून गेल्या
कितीक कोवळ्या सुंदर कळी
नाव असे निर्भया...
मानव विरुद्ध दानववृत्ती झाली बलवान
कितीक झाल्या वासनाच्या बळी
वासनांध ते हृदयी नसे दयामाया
नराधम कृत्य ओरबाडती ते काया...
बहिरे सरकार नसे रुदन ऐकाया
नको हे यज्ञकुंड! नको झोकू तू काया
उठ...ए नारी ! तू हो नारायणी !
घे हाती तळपती तलवार हो भवानी
बस्स!नको रडणे नको कुढणे
आता एकच आपुला निर्धार!
मिळून सा-या जणी आपण
करु नवा एल्गार !
नको दया नको माया
जे जे नाठाळ त्यांना दे धरणी ठाय!
किती आले करुन गेले वायदा
डोळ्यांवर पट्टी बांधून उभा आंधळा कायदा
आपण होऊ दुर्गा चंडी कालिका
नराधमांना लावू शिवकायदा
हाच ग् खरा न्याय...
संपवू आता आपण !
आपुल्यावरचा अघोरी अन्याय!
© पुष्पा पटेल " पुष्पम् "