Followers

शुक्रवार, ऑगस्ट १९, २०२२

बासरी मनमोहनाची

🌷🌷🌷जीवलग गृप अंतर्गत आजचा विषय-बासुरी मनमोहनाची...!
विषय सुचक-सौ पुष्पा पटेल "पुष्पम्" अर्थात मीच स्वतः🌷🌷🌷

    बासरी...पावा ! हे भगवान् श्रीकृष्णाच्या हातात शोभणारे एक लोभस वाद्य. भल्या भल्यांना वेड लावणारे...! कन्हैयाच्या बासरीचे सूर उमटावेत आणि गोपिकांनीच काय गाई-वासरांनीही देहभान विसरून जावं इतकी ह्या बासरीची किमया अगाध...!
श्रीकृष्णाच्या मनमोहक बासरीला जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला ती बासरी श्रीकृष्णाच्या हातात कशी आली ते पाहणे अधिक रंजक ठरेल.         
    द्वापारयुगाच्या काळात भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवर अवतार घेतला असता त्यांना भेटायला देवी देवता वेळोवेळी पृथ्वीवर येत असत.भगवान श्रीशंकरजींनी पाहिले की आपणही श्रीकृष्णांना भेटायला जावे. पण,भेटायला जातांना रिकाम्या हातांनी जाणे योग्य ठरणार नाही .हा मनात विचार येताच श्रीशंकर थांबले. काय बरे घेऊन जावे श्रीकृष्णांना भेट देण्यासाठी आपण ? अशी एखादी वस्तू न्यावी की जी भगवंतांना अतिशय प्रिय वाटेल, आणि ती कधीही सोडायच्या मोह त्यांना होणार नाही .श्री शंकरजींनी खूप विचार केला. हाऽऽ आठवले तर ! त्यांच्याजवळ दधिची ऋषीचे एक हाड पडून होते. दधिची ऋषी हे महान ऋषी होत. त्यांनी देव दानवांच्या युद्धात दानवांवर देवांना विजय प्राप्त करता यावा यासाठी आपले संपूर्ण शरीर इंद्राला दान दिलेले होते. त्याच दधिचीच्या हाडाने वज्रनामक आयुध बनविण्यात आले होते. नंतर उरलेली जी काही हाडं होती ,त्यातून विश्वकर्माने तीन प्रकारचे धनुष्य बनवले एक पिनाक धनुष्य, दुसरं गांडीव धनुष्य, आणि तिसरे शारंग धनुष्य. शंकरजींनी ते उरलेले एक हाड हाती घेतले. त्याला घासून योग्य असा आकार दिला , आणि अत्यंत सुंदर मनमोहक अशी एक बासुरी तयार झाली.श्री शंकरजी ती सुंदर बासुरी घेऊन श्रीकृष्णांच्या भेटीला निघाले. भगवंत तेव्हा गोकुळात होते.गोकुळात जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना स्वहस्ते तयार केलेली ती बासुरी प्रेमभराने सुपूर्द केली . भगवान श्रीकृष्ण अत्यंत आनंदित झाले आणि श्रीशंकरजींनी आपल्यासाठी आणलेली ही खूप अनमोल भेट आहे असे आनंद्गोगार काढले.
म्हणाले, महादेव...आपण आणलेली ही भेट अद्भूत अशी आहे. आपण दिलेली ही अनमोल भेट मी या अवतारात तरी विसरणार नाही.ही बासुरी एक क्षणभरही मी कधीही माझ्यापासून दूर करणार नाही. असे आश्वासन दिले.
कन्हैयाने आपल्या पूर्ण अवतार कार्यात ती बासरी अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या हाती ठेवली.
अशी ही बासरी श्रीकृष्णाची मोहक बासरी झाली. बासरी आणि श्रीकृष्ण हे नातं अतूट झाले.
    श्रीकृष्ण ती बासरी ओठांना लावून जेव्हा वाजवत असत तेव्हा त्या बासरीचे सूर चराचरातील यच्चयावत घटकांना मोहित करीत असत.असे म्हटले जाते की, श्रीकृष्ण यमुनेच्या काठी गाई घेऊन जात.सोबत गोपाळ असत. जेव्हा ते बासरी वाजवत तेव्हा खळाळणारे यमुनेचे पाणी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन वाहणे थांबत असे. गाई गुरे वासरे सर्व बासरीचे सूर ऐकताच कदंबाच्या झाडाखाली बेभान होऊन गोळा होऊ लागत.कदंबवनातील पशू,पक्षी, श्रीकृष्णाच्या आजूबाजूला येऊन बसत असत. कदंब वनातील मोर बासरीच्या सुरांनी मुग्ध होऊन आपला पिसारा फुलवून थुईथुई मनमोहक नृत्य करू लागत. वृक्ष वेलीचे थरथरणे सुरांनी मोहित होऊन बंद होई. ज्या ज्या नरनारींच्या कानी बासरीचे सूर पडत त्यांची तहानभूक विसरली जात असे.गोकुळातील गवळणी हातातील काम धंदा सोडून,खाणे-पिणे सोडून भान हरपून कृष्ण भेटीला निघत.पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या काठी बासुरीच्या सुरांनी मोहित होऊन चंद्र,तारे उंच आभाळी जागच्या जागी स्तब्ध होत असे.राधिकेला भेटीची हुरहूर दाटून लागले.तीला कृष्ण भेटीची उत्कंठा दाटून ती बावरी होई. आकाशातून वर्षाव करणाऱ्या मेघांच्या धारांचे कोसळणे बंद होई. 
अशी अगाध मोहिनी श्रीकृष्णाच्या बासरीची होती. गोपिकांना तर या बासरीने अक्षरशः वेड लावले होते. कृष्णाची बासरी वाजावी व कृष्णाच्या बासरीतून सूर निघावे, आणि गोपिकांनी त्या सुरांनी मोहित होऊन श्रीकृष्णाच्या भेटीला धावत येऊ नये असे कधी झालेच नाही, आणि ज्या दिवशी श्रीकृष्णाची बासरी वाजली नाही तिचे सूर कानी आले नाही त्या विरहाने सुद्धा गोकुळातील गोपिका वेड्या होत.अशा या बासरीचे अमोघ वर्णन करता येईल.या बासरीच्या सुरांनीच राधा श्रीकृष्ण यांच्यात प्रेमबंध जुळला होता. गोपिकांना वाटे की श्रीकृष्णाने आपल्याजवळ जास्त वेळ खेळावे, आपल्याजवळ जास्त थांबावे ...पण तो बासरीशी जितका खेळतो तेवढा आपल्याशी का खेळत नाही?अर्थात् ती बासरीची किमया की कन्हैयाची हे सांगणं अवघडच...! याविषयी एक कथा सांगितली जाते... 
 कृष्णाचं आपल्यावर नव्हे तर बासरीवर सर्वात अधिक प्रेम आहे हे जाणून गोपिका बासरीवर चिडून असायच्या. एकदा त्यांनी बासरीलाच विचारलंच की,अग बासुरी... आम्ही असताना कन्हैयाचं तुझ्यावर इतकं प्रेम कसं? तर बासुरीने सुंदर उत्तर दिलं की, मला एकूण सात छिद्रं आहेत. त्यातल्या ६ छिद्रांतून षड्रिपू ( काम, क्रोध,मद,
मोह,लोभ, मत्सर,)केव्हाच 
बाहेर गेलेले आहेत. सातवे छिद्र म्हणजेच माझे (बासुरीचे) मुखरंध्र, तिथून केवळ कन्हैयाने फुंकर मारली तरच सूर निघतो.(आवाज येतो) म्हणजे मला स्वतःचा आवाज नाही. म्हणूनच मला अहंकारही नाहीच. म्हणूनच कन्हैयाला मी जास्त जवळची आहे. हे ऐकून गोपींचा अजूनच जळफळाट झाला.आणि त्या स्वतःला बासुरी बनून घेण्याचा प्रयत्न करु लागल्या.अशी ही बासुरी मनमोहक मनमोहनाची!
🙏🌹 जय राधे कृष्ण !🌹🙏

🌷🌷जीवलग सारखा गृप असावा🌷🌷
🌷🌷प्रेम जिव्हाळा मनी वसावा🌷🌷

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

३ टिप्पण्या:

  1. मॅडम, कन्हैयाची बासरी,तिचा जन्म,तिची महत्ता,सात छिद्रे यांचे रसभरीत वर्णन अप्रतिम शब्दांत केले आपण! लेखातून न मिळालेली माहिती प्राप्त झाली! ✍️👌👌👌
    जय राधे कृष्ण 🌹🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच सुंदर माहिती मिळाली.... ✍️✍️👌👌👌🙏🏼🙏🏼💐💐

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल