Followers

शुक्रवार, जून १७, २०२२

संजीवक अमृत चहा !

चहा म्हणजे सकाळचं अमृत असतो
चहा म्हणजे जगण्याची उर्मी
अन् हाॅस्पीटल मधल्या रुग्णांची स्फूर्ती
कार्य करण्याची देतो शक्ती
टेंशन आलं की सुचवितो नामी युक्ती
पाहुणचाराला तो प्रथम हवा
पार्टीला त्याचा पहिला मान
मुलाखतीला असतो टेबलवरची शान
कुणी काहीही म्हणा पण चहा हवाचं
पावसाळ्यात रिमझिम पावसात लागते भूक
तेव्हा गरम गरम भजी बरोबर वाफाळणारा चहा म्हणजे...
जणू स्वर्गसुख
असा गोड गोड अमृतमय चहा प्यायची मज्जा भारी
लहान मुलं खातात त्यांच्यासोबत बिस्कीट-खारी
अशा गोड दिव्य चहाची गोष्ट खूप खूप भारी !

समस्त चहा शौकीनांना आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
☕🫖☕🌹🌹☕🫖☕

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
      म्हसावद

शनिवार, मे २८, २०२२

माझे बालपण!

म्हणतात ना "बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा!"अगदी तसंच माझं बालपण साखरेचा रव्यासारखं खूप खूप गोड होते!
कधीही मला आता कंटाळा आला की तेव्हा आठवते मी माझे गोड, खट्याळ बालपण आणि बालपणीच्या आठवणी! कित्ती मज्जा होती त्यावेळी...ना कसलं काम ना कसली जबाबदारी होती फक्त मी आनंदलहरी!बाबांची होती लाडकी आईची सोनुली तर आज्जी आजोबांची होते मी तान्हुली !काय सांगू तुम्हाला माझी बालपणीची गम्मत सगळ्यांची मी होते लाडकी
मैत्रीणींसोबत खेळ खेळत अल्लडपणे खिदळणे, भातुकलीच्या खेळ नी त्यातले रुसवे फुगवे,अक्षय तृतीया आली की झोपाळा त्यानंतर गौराईचा गोतावळा, कोजागरी पौर्णिमा आली भुलाबाईची गाणी, झिम्मा फुगडी रास,गरबा एकमेकांचा खाऊ ओळखण्याची चढाओढ तसेच रंगपंचमीच्या सप्तरंगात न्हाणे! सगळं कसं अगदी स्वर्ग सुख होतं. अगदी सुख असो की दुःख कधीच मागे नाही राहिलो.सगळ्या मैत्रीणी अगदी जीवाला जीव देणा-या होतो आणि आजही आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटतो,मोबाईलवर बोलतो तासनतास!
  तसेच आमच्या घरीही आम्ही तिन भावंड मी मोठी त्यानंतर एक बहिण आणि मग लहान भाऊ.
मी मोठी असल्याने मला नेहमीच समजूतदारपणा दाखवावा लागे आणि ती दोघं नेहमी भांडायची पण मला मात्र आज्जी म्हणायची बेटा तू मोठी बहीण आहे त्या दोघांची मग तू घे ना समजून! मला मात्र तेव्हा खूप राग यायचा माझ्या मोठेपणावर.वाटायच़ं,"बाप्पाने मलाच का मोठी बहीण केलं मी सगळ्यात छोटी असते तर कित्ती मज्जा आली असती?"
  तसेच मामाच्या गावाला सुट्टीत ही खूप खूप मजा केली आम्ही.मामेभाऊ, मामेबहीण सगळे भर दुपारी नाना नानी झोपले की गुपचूप  उन्हात पानपिपळी,डबल इस्टोल असे खेळ खेळायला पळायचो.आणि मग नानांना जाग आली की एकमेकांवर यानेच मला खेळायला नेले असं खोटे आरोप करुन वेळ निभावून न्यायचो.कितीही भांडण झाले तरीही रात्री एकाच ताटात आनंदाने जेवायचो.कित्ती निर्मळ होते तेव्हा मन!
बालपण म्हणजे देवाने दिलेली अनमोल भेट असं मला वाटतं.म्हणून मी ते माझ्या हृदयाच्या कोंदणात अगदी अलगदपणे जपून ठेवलं आहे.
 आज एवढंच बस्स🙏

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
          ‌म्हसावद

मंगळवार, मे २४, २०२२

चाहूल पावसाची

पावसाची चाहूल लागता
बळीराजा शेतशिवारी रमतो
तरु,वेली,अन् पर्णापर्णावर
पाऊस सरींचा सडा जमतो

पावसाची चाहूल लागता
कवी मनाला येतो हुरुप
अक्षरांना जणू फुटतो कोंब
हिरवांकूंरा लाभे काव्य रुप

पावसाची चाहूल लागता
चातक गातो तरुतळी
पर्जन्यधारेला आलिंगन द्याया
नजर देई तो दिगंतराळी

पावसाची चाहूल लागता
वेडापिसा होतो वारा
सोबत घेऊन येई काळे ढग
अन् श्वेत मोत्यांचा धारा

पावसाची चाहूल लागता
बक तनुवरी केशरी रंग
मयुर फुलवी सुंदर पिसारा
मयुरी संगे होऊन दंग 

पावसाची चाहूल लागता
सागराला जला येई उधाण
किना-याला भेट द्याया
उंच लाटांनी होई बेभान

पावसाची चाहूल लागता
मन माझे घाले रूंजी
सख्यांभोवती पिंगा घाली
झुले आठवणींची पुंजी

पावसाची चाहूल लागता
आठवण येई बालपणीची
कागदी होड्या बनवून सोडी
मज्जा ती अनोखी बालमनाची

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
     म्हसावद

मंगळवार, मे ०३, २०२२

जीवन एक काव्यग्रंथ!

जीवनाच्या कवितांनी भरली
माझ्या   काव्यग्रंथाची  पाने
सुख  अश्वावर  होऊन स्वार
मी गाते  सुमधूर जीवनगाणे

जीवनाच्या  कवितेत माझ्या
आहे  बरं आनंदाची  हो पानं
त्या  पानांना  जपते  हळूवार
वाटते  मी  सुखाचे  हो  दान

जीवनाच्या  कवितेत  माझ्या
निरागस   बालपणाचं   पान
मौज - मज्जा   आणि  खेळ
आहेत  जणू आनंदाची खाण

जीवनाच्या  कवितेत  माझ्या
सप्तरंगी  जबाबदारीचे  पान
आपुलकीच्या   दृष्टीने  बांधून
वाटते   स्नेह   सौख्याचे वान

जीवनाच्या   कवितेत  माझ्या
सहजीवनाचं    अनोखं   पान
विश्वास    समर्पण   हृद्यप्रेमाने
अहोंचा हृदयी मिळविले स्थान!

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, एप्रिल २८, २०२२

मन!

लेखन प्रकार-स्फुट लेखन 

विषय-मन

आपण जीवन जगत असतांना 
आपल्या आजूबाजूला सतत बरं-वाईट ,सुख-दु:ख,आनंद-क्लेश देणारं असं काहीतरी घडत असतं.त्यापैकी काही चांगल्या,काही वाईट घटना आपल्या मनावर नकळत कोरल्या जातात.त्यातून मनावरही बरे-वाईट घटनांचे जाळे तयार होऊन मन अस्थिर होते आणि मनात संघर्ष सुरू होतो.त्यावेळी हे ' मन ' नावाचं डोळ्यांना न दिसणारं इंद्रिय हाती धरुन ठेवावं तर तेही करता येत नाही.जलाशयात उठणा-या तरंगासारख,पा-यासारखं नाजूक-हाती न येणारं असं हे मन जीवाला स्वस्थता लाभू देत नाही.खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांनाही प्रश्न पडला होताच की ! म्हणून तर त्या मनावर चिंतनशील काव्य लिहून गेल्या.
' मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।। ' 
मनाच्या अशा गमजा विचारात घेऊन निराश होऊन शांत बसून नाही चालणार !
मग आपण काय करावे? तर...
सकारात्मक विचार करून जर आपण जीवनाची वाटचाल सुरू ठेवली तर आपल्या वाटेवर खूप आनंदाचे क्षण, समाधानाचा फुलांची पखरण आपल्याला अनुभवाला येते. " भरून पावलो देवा !" असे आनंदानुभूती देणारे उद्गार आपसूकच ओठांवर तरळू लागतात. 
    पण नकारात्मक विचारांचा बेडूक पाहत बसलो तर तो हळूहळू फुगत जातो.हे लक्षात घ्यावे. मनाला सदैव ताब्यात ठेवता आले पाहिजे.असे जर केले नाही तर...मनाच्या घोड्यावर राग नावाचा रिपू स्वार होतो आणि तो मोठ्या कष्टाने,प्रेमाने, जिव्हाळ्याने जीवनात जे जे काही चांगलं पेरुन ठेवलेलं असतं,त्या शेतीची नासधूस करीत सुटतो.म्हणूनच ' राग ' या स्वाराला मनाच्या अश्वाजवळ येऊच देऊ नये.त्यासाठी ' संयम ' नावाचा द्वारपाल जवळ बाळगावा.
थोडक्यात काय तर ... आपल्या ' मन ' रुपी अश्वावर आपलं पुर्णतः नियंत्रण असले पाहिजे.त्याला चौखूर उधळू न देता तोंडांत काटेरी लगाम लावता आली पाहिजे.निश्चयाच्या रिकिबीत पाय घट्ट रोवता आले पाहिजे. म्हणजे खाली पडण्याचा धोका ( अपमानित होण्याचा) निर्माण होणार नाही.
    सोप्या शब्दात सांगायचे तर - प्रियजनहो,रागाच्या भरात,संयम विसरुन कोणताही लहान असो वा मोठा निर्णय घेऊ नका. राग आल्यावर चिडू नका ,तर काही वेळ डोळे घट्ट मिटून शांत बसून रहा.एक ते शंभर अंक बोलत रहा. आपल्या आवडत्या व्यक्तीशी संवाद साधा.आवडत्या फुलांचा सुगंध अनुभवा, परंतु अशा प्रसंगी मूग गिळून एकांतात गप्प बसणे ही कृती " हलाहल विष ' समान ठरु शकते.शेवट काय? तर स्वविनाश हा अटळच!
  लक्षात ठेवा,तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य फक्त तुमच्या मनात स्फुरणा-या सकारात्मक विचारात आहे.म्हणून काम,क्रोध, मद,मोह,मत्सर आणि मोह या षढ्रिपूंवर विजय मिळवायला शिका.
शांत,संयमी राहाल तर हमखास सुखसमृद्धी मिळवाल.
     संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की, मनासारखं  दुसरं दैवत आपल्याला शोधून ही सापडणार नाही म्हणून ते म्हणतात-
मोकळे मन रसाळ वाणी | याची गुणीसंपन्न ||१||
लक्ष्मी ते ऐशा नावे | भाग्य ज्यावे नरी त्यांनी ||२||
नमन ते नम्रता अंगी | नेघे रंगी पालट ||३||
तुका म्हणे त्यांची नावे | घेता व्हावे संतोषी ||४||
इतुके सांगुन संत शिरोमणी तुकाराम महाराज थांबत नाही तर ते म्हणतात-
" मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण !
मोक्ष अथवा बंधन  सुख समाधान इच्छा ते!"
म्हणून आपण आपले मन सदैव निर्मळ,निरोगी,निडर,निकोप ठेवू या ! सदैव प्रसन्नचित्त,आनंदी,राहू या !
माझ्या मनातही आता एक फुलपाखरू उडतयं ते असं...
    मन फुलपाखरू

आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन माझे वेडे झुलते रे !
क्षणात येते क्षणात जाते
फुलपाखरू होऊन भिरभिरते रे !
बालपणीच्या अल्लड वाटा
उनाड होऊन चालते रे !
बालपणीच्या तो काळ सुखाचा
कानी हळूच गुणगुणते रे !
निमिषार्धात घेऊन गिरकी
सप्तरंग जीवनाचे दाखवी रे!
सुख हर्षाच्या गंधकोषी
सख्यासवे गूज करते रे !
नाजूक लता ही संसाराची
हळवे होऊन जपते रे !
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन माझे वेडे झुलते रे !

🌹 शुभं भवतू 🌹 
🙏 🌹जय जय पांडुरंग हरी 🌹🙏


©®सौ. पुष्पा पटेल "पुष्पम्".
    मु.पो.म्हसावद.

सोमवार, एप्रिल २५, २०२२

सुखी संसार!

सख्या,संसाराचा मांडलाय ना डाव
मग खेळू आपण तो आनंदें

तू जिंकलास तरी डाव आपलाच!
मी जिंकले तरी डाव आपलाच!

पण...त्यात रड मात्र नसावी
अखंड सोबत मला तुझी असावी

सुखदुःखाचा लाटेतही करु
जीवननौका ही आपुली पार 

माहिती रे!सारे हे डाव घडीचे 
पर्वा कुणाची का करावी ?

आपणच एकमेकांना जवळचे!
हाती हात  घेऊन  चालायचे...!

©®सौ. पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, एप्रिल २३, २०२२

योद्धा!

वाटतं तितकं सोपं नाही
योद्धा बनून जगणं...
सा-या स्वप्नांना बाजूला सारून
एकनिष्ठ होऊन देशासाठी लढणं...

आई,बाबा,पत्नी, मुलं
सुखदुःखात सारेच बघतात वाट
कुणाच्या होतील अपेक्षा पूर्ण
लढता लढता संपतो जीवनघाट

व्हावे सैनिकासारखा योद्धा
त्याग असे त्याचा महान
मायभूच्या रक्षणासाठी
करितो प्राणाचे बलिदान

वंदन करिते मी ...
योद्ध्यासी  कृतज्ञ होऊन
दोन्ही सुपूत्र भारतभूचे
जय जवान जय किसान!🙏

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल